फिरोज सिकलकर:-
शिरूर सध्याच्या स्पर्धेच्या आणि सोशल मीडियाच्या युगात तरुण पिढी मोबाईलमध्ये अधिक गुंतलेली दिसून येत आहे. अशा परिस्थितीत येणाऱ्या पिढीला आपल्या ऐतिहासिक किल्ल्यांचे महत्त्व समजावे व भविष्यात या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ते पुढे यावेत, या उद्देशाने मातोश्री प्रतिष्ठान किल्ले स्पर्धेचे आयोजन करत असल्याचे प्रतिपादन मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजीत आंबेकर यांनी केले.
मातोश्री कला, क्रीडा व शैक्षणिक संस्थेच्या वतीने दिवाळीनिमित्त किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील बक्षीस वितरण कार्यक्रम स्पर्धकांच्या घरी जाऊन पार पडला. स्पर्धेमध्ये ६० पेक्षा अधिक स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. प्रथम पाच क्रमांक मिळविणाऱ्या स्पर्धकांना त्यांच्या घरी जाऊन रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या वेळी मातोश्री प्रतिष्ठानचे शैलेश जाधव, सतीश केदारी, ओंकार भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या वीस वर्षांपासून मातोश्री प्रतिष्ठान सातत्याने किल्ले स्पर्धेचे आयोजन करत आहे. सोशल मीडियामुळे मोबाईलमध्ये गुंतलेल्या आजच्या पिढीला आपल्या वैभवशाली इतिहासाची ओळख व्हावी, किल्ल्यांचे महत्त्व समजावे आणि त्यांच्या जतन-संवर्धनासाठी प्रेरणा मिळावी, या उद्देशाने ही स्पर्धा राबवली जाते. देशाची शान असलेले किल्ले तरुण पिढीच्या मनात सदैव प्रेरणास्थान राहावेत, यासाठी प्रतिष्ठान दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे शैलेश जाधव यांनी सांगितले.
या स्पर्धेत
साई संदीप लंघे – प्रथम क्रमांक (रोख रक्कम व सन्मानचिन्ह)
अर्चना पाथरकर – द्वितीय क्रमांक (रोख रक्कम व सन्मानचिन्ह)
साई श्रीकांत धोत्रे – तृतीय क्रमांक (रोख रक्कम व सन्मानचिन्ह)
रियांश पाचर्णे – चतुर्थ क्रमांक (रोख रक्कम व सन्मानचिन्ह)
चेतन संघवी – पाचवा क्रमांक (रोख रक्कम व सन्मानचिन्ह)
स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकास पदक देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे स्वागत सतीश केदारी, सूत्रसंचालन शैलेश जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन ओंकार भोसले यांनी मानले.
छायाचित्र : मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने किल्ले स्पर्धेचे बक्षीस वितरण करताना पदाधिकारी व प्रथम क्रमांक मिळविणारा साई लंघे व त्याचे सहकारी.









